शैक्षणिक चळवळीतील दीपस्तंभ
Our History
१९४७ साली देश स्वतंत्र झाला. शिक्षणाचे वारे देशभर अधिक वाहू लागले होते. कै. अण्णासाहेब कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमुर्ती रानडे, रमाबाई रानडे यांनी स्त्री शिक्षणांची चळवळ जोरात चालू केली होती. रत्नागिरीमध्ये कर्वेंची मानसकन्या सौ. मालतीबाई जोशी व श्री. बाबूराव जोशी यांनी १९२५ साली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. १९३३ साली रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. गोगटे कॉलेज सुरु केले. शिर्के हायस्कूल सुरु झाले. मा. अरुअप्पा जोशींनी संस्थेचा आणखी विस्तार केला. लॉ कॉलेज, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीअम स्कूल सुरु झाले. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालय या प्राथमिक शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात केळ्ये येथे गोडबोले विद्यालय हे हायस्कूल सुरु झाले. शिर्के प्रशालेच्या प्रांगणात गुरुकुल प्रकल्प सुरु झाला. आता महाराष्ट्रातील बहुदा पहिलाच इंग्लिश मिडीअम गुरुकुल प्रकल्प सुरु झाला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने नॅकचे ए दर्जाचे मानांकन तीन वेळा प्राप्त केले आहेच. त्याचबरोबर ‘कॉलेज वुईथ पोटेंशिअल फॉर एक्सलन्स’ चा दर्जा व ग्रँट प्राप्त झाली आहे. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय कोकण बोर्डात सातत्याने अव्वल आहे. अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले अनेक जण आज विविध शासकीय आस्थापनात विविध पदांवर कार्यरत झाले आहेत. रमेश कीर कला अकादमीचे अनेक कलावंत चित्रपट, टीव्ही मालिका, नाटके इत्यादी माध्यमांतून आपला ठसा उमटवत आहेत. ह्या सर्व बाबी आम्हांला अभिमानास्पद आहेत. बारटक्के इन्स्टिट्यूट उपयुक्त संगणक अभ्यासक्रम कोकणातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. काळाची गरज ओळखून परदेशी भाषा केंद्र जर्मन जापनीज सारख्या भाषा.शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. आती पर्यंत संस्थेतून जवळ जवळ १००००० विद्यार्थी शिकून बाहेर
"संस्था मोठी आहे, माणसं नव्हेत..." - बाबुराव जोशी
“संस्था मोठी आहे, माणसं नव्हेत, संस्था चिरस्थायी असतात, व्यक्ती आज आहेत उद्या नसतील हे सतत लक्षात ठेवा’ हा संस्थापक कै. बाबुराव जोशींचा विचार नव्या कार्यकर्त्यांना नेहमीच अक्षय ऊर्जा प्राप्त करून देतो.
बाबुराव जोशींनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९२० साली आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात रत्नागिरीत महाविद्यालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांची दूरदृष्टी, अथक प्रयत्न, व्यापक जनसंपर्क व संघर्षातून १९४५ साली गोगटे- जोगळेकर महाविद्यालय सुरू झाले. संस्थेने नव्या शाखा व उपक्रम सुरू करून अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. गतवेळी नॅकच्या तृतीय मानांकनात ‘अ’ श्रेणी मिळवून महाविद्यालयाने आपल्या लौकिकात भर घातली आहे.
बाबुरावांनी अनेक आव्हाने समर्थपणे पेलली. नवी स्वप्ने पाहिली आणि आयुष्यभर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट घेतले. वकिलीचा त्याग केला. अपमान सहन केला; परंतु ध्येयपूर्तीच्या ध्यासाने, मालतीबाईंच्या सहकार्याने अत्यंत तळमळीने, निरलस वृत्तीने व प्रामाणिकपणे संस्थेचा लक्षणीय विस्तार केला.
कै. मालतीबाईंनी एकेक आणा गोळा करून भाऊबीज फंडातून महिला विद्यालयास आर्थिक स्थैर्य दिले. त्याकाळात वेळप्रसंगी मालतीबाई महिला विद्यालयात एक तास घेत व उन्हातून चालत जात शिर्के हायस्कूलमध्ये दुसरा तास घेत असत. मालतीबाईंची संस्थेवरील निष्ठा अविचल होती.
संस्थेच्या इमारतीची कौले बदलण्यास मदत करणारे बाबुराव, दिवाळी समोर असतानाही गिरणीच्या गल्ल्यातील तीन रुपये देऊन शिक्षकाची गरज भागविणारे बाबुराव, निधी संकलनाकरिता चित्रपटाची रिळे घेऊन गावोगाव पायपीट करणारे बाबुराव आणि वाढत्या वयात देखील आपली जुनी सायकल वापरून संस्था उभी करणारे बाबुराव आम्हाला दीपस्तंभासारखे आहेत.
बाबुराव आणि मालतीबाईंनी प्रज्वलित केलेला हा अंतरीचा ज्ञानदीप आपण सर्वांनी तेवत ठेवला पाहिजे.